मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे त्यांनी कधीही औपचारिक शाळेत शिक्षण घेतले नाही, पण त्यांनी शिक्षण संस्थांचे महत्त्व कमी लेखले नाही. उलट त्यांनी आयुष्यभर अशा शिक्षण संस्था उभारल्या ज्या लाखो भारतीयांना शिक्षण देऊ शकतील.

मौलाना अब्दुल कलाम आझाद. छाया: ब्रिटॅनिका

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा नीट पेपर फुटी प्रकरणी राजीनामा घेण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती की, अखेर त्यांना राजीनामा दिल्यानंतर सरकारची फार मोठी हार झाली असे मानले जावे लागेल. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये असे प्रसंग अनेक वेळा उद्भवले आहेत. एका ट्रॅक्टर खरेदी प्रकरणांमध्ये आणि अनुदान देण्यामध्ये तत्कालीन अर्थमंत्र्याच्या नातेवाईकाचा हात असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राजीनामा देण्यास सांगितले होते. चीनने १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले आणि भारताचा या युद्धात पराभव झाला. तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांच्यावर प्रचंड टीका झाली. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली गेली. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू यांना ही मागणी मान्य नव्हती. राजकीय दबाव वाढल्यानंतर यांना राजीनामा द्यावा लागला.

अशा या सर्व पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणे. हे काही फार मोठे सरकारचे अधपतन नव्हते. नीट पेपर फुटीमुळे जो असंतोष शैक्षणिक क्षेत्रात आणि विशेषता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. त्याची जबाबदारी कोणीतरी स्वीकारला पाहिजे होती. म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुढे केली जात होती. नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतरचे धर्मेंद्र प्रधान हे पाचवे शिक्षण मंत्री होते. यापूर्वीच्या चारही शिक्षण मंत्र्यांनी या क्षेत्रात कोणतीही भरीव कामगिरी केली नाही. तीच परंपरा धर्मेंद्र प्रधान देखील चालवत होते. या पार्श्वभूमीवर भारताला लाभलेल्या पहिल्या शिक्षण मंत्र्यांच्या कारकिर्दीवर एक नजर जरी टाकली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळाचे एकेक दिग्गज मंत्री गण किती महत्वाची कामगिरी बजावत होते. याची आपल्याला कल्पना येईल. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी सलग अकरा वर्षे काम केले होते.

धर्मेंद्र प्रधान. छाया: द प्रोब

“माझे वडील जुन्या परंपरांवर विश्वास ठेवणारे होते. त्यांना पाश्चात्त्य शिक्षणावर मुळीच विश्वास नव्हता,” असे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी आपल्या इंडिया विन्स फ्रीडम या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन यांनी त्यांना मदरशातही पाठवले नव्हते. त्यांनी घरीच शिक्षण देणे पसंत केले. ज्या मुलाने कधी औपचारिक वर्गात पाऊल ठेवले नाही, तोच पुढे स्वतंत्र भारताचा पहिला शिक्षणमंत्री झाला आणि सलग अकरा वर्षे आधुनिक भारतीय शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी करत राहिला.

वयाच्या दहाव्या वर्षापूर्वीच मौलाना आझाद फारसी शब्दकोश तयार करण्याचे काम करू लागले होते. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. किशोरवयातच ते कविता लिहू लागले आणि काव्यविषयक नियतकालिक प्रकाशित करू लागले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी लिसान-उस-सिद्क या मासिकाचे संपादन केले.

महात्मा गांधी यांना भेटण्यापूर्वी आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले होते. वयाच्या केवळ ३५ व्या वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यांनी फाळणीला ठाम विरोध केला आणि फाळणीनंतर दिल्लीच्या जामा मशिदीच्या पायऱ्यांवर उभे राहून घाबरलेल्या भारतीय मुस्लिमांना देश सोडू नका, असे आवाहन करीत होते.

मौलाना अब्दुल कलाम आझाद हे ऑगस्ट १९४७ पासून फेब्रुवारी १९५८ मध्ये निधन होईपर्यंत देशाचे शिक्षणमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात आय आय टी खरगपूर, विद्यापीठ अनुदान आयोग, विद्यापीठ शिक्षण आयोग, माध्यमिक शिक्षण आयोग, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, साहित्य अकादमी, ललित कला अकादमी आणि संगीत नाटक अकादमी यांची स्थापना केली. तांत्रिक शिक्षण, प्रौढ साक्षरता, मोफत व सक्तीचे शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, महिला शिक्षण आणि शिष्यवृत्ती योजनांच्या विस्तारातही त्यांचे मोठे योगदान होते.

पंतप्रधान नेहरू यांच्या समवेत मौलाना अब्दुल कलाम आझाद. छाया: एक्सप्रेस आर्काइव्ह

आझाद यांचा जन्म १८८८ मध्ये मक्का येथे इस्लामी विद्वानांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील पाश्चात्त्य शिक्षणाबद्दल साशंक होते आणि ते धार्मिक श्रद्धा कमकुवत करेल असे त्यांना वाटत होते. त्यांचे कुटुंब कोलकात्यात स्थायिक झाल्यानंतर आझाद यांचे शिक्षण पारंपरिक मुस्लिम अभ्यासक्रमानुसार झाले. प्रथम फारसी, अरबी, त्यानंतर धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, भूमिती, गणित आणि बीजगणित असे झाले. सुरुवातीला वडिलांनी स्वतः शिकवले आणि नंतर प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक नेमले. परंतु लवकरच त्यांना जाणवले की, वडिलांनी निवडलेला अभ्यासक्रम मर्यादित आहे. सर सय्यद अहमद खान यांचे लेखन वाचल्यानंतर त्यांनी विज्ञान, आधुनिक तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे महत्त्व ओळखले. त्यांनी गुप्तपणे इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली. शब्दकोशाच्या मदतीने वृत्तपत्रे वाचली आणि नंतर इतिहास तसेच तत्त्वज्ञानाची पुस्तके अभ्यासली.

वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी लिसान-उस-सिद्क हे मासिक सुरू केले. त्यांच्या लेखनामुळे त्यांची ख्याती दूरवर पसरली. १९१२ मध्ये त्यांनी अल-हिलाल हे वृत्तपत्र सुरू केले. प्रभावी उर्दू भाषेत लिहिलेले हे वृत्तपत्र ब्रिटिश साम्राज्यवादावर कठोर टीका करीत असे आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करीत असे. ब्रिटिश सरकारने त्यावर दंड आणि इतर निर्बंध लादले. त्यामुळे अल-हिलाल बंद करावे लागले. त्यानंतर त्यांनी अल-बलाघ सुरू केले, परंतु तेही सरकारच्या दडपशाहीमुळे बंद करावे लागले. अखेर त्यांना रांचीजवळील मोराबादी येथे नजरकैदेत ठेवण्यात आले. पत्रकारितेने एका धार्मिक विद्वानाच्या मुलाला राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे नेतृत्व दिले.

नवी दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन. छाया: डेक्कन क्रॉनिकल

अनेक मुस्लिम नेते जेव्हा १९३० नंतर स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी करीत होते, तेव्हा आझाद यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यांच्या मते हिंदू आणि मुस्लिम या दोन वेगळ्या राष्ट्रांच्या संकल्पना चुकीच्या होत्या. भाषा, इतिहास, भूभाग, अर्थव्यवस्था आणि सामायिक राजकीय भविष्य या आधारांवर दोन्ही समुदाय एकत्र राहू शकतात, असे त्यांचे मत होते. १९४० ते १९४६ या काळात काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या मागणीला विरोध केला. पण अखेरीस फाळणी अटळ ठरली. त्यांच्या मते, स्वातंत्र्याची किंमत भारताच्या विभाजनाच्या रूपाने मोजावी लागली. फाळणीनंतरच्या हिंसाचाराने ते व्यथित झाले.

शिक्षणमंत्री म्हणून आझाद यांच्यासमोर मोठी आव्हाने होती. देश गरीब, निरक्षर आणि फाळणीच्या जखमांनी ग्रस्त होता. शाळांची कमतरता, प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव आणि उच्च शिक्षणातील सुधारणा या गरजा तातडीच्या होत्या.

आझाद यांना वाटत होते की, राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नाही. देशाच्या संसाधनांचा विकास करण्यासाठी वैज्ञानिक, अभियंते, डॉक्टर आणि संशोधक तयार करणे आवश्यक आहे.
आय आय टी खरगपूरची स्थापना हे त्यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. ब्रिटिशांनी राजकीय कैद्यांसाठी वापरलेल्या हिजली कारागृहाच्या जागेवर या संस्थेची उभारणी झाली. उद्घाटनावेळी आझाद म्हणाले, “भारतामधील तांत्रिक शिक्षणाची पातळी इतकी उंच व्हावी की उच्च वैज्ञानिक आणि तांत्रिक शिक्षणासाठी परदेशातील विद्यार्थी भारतात यावेत, अशी माझी अपेक्षा आहे.”

मोफत शिक्षण
आझाद यांना शिक्षण हे केवळ उच्चभ्रूंचे विशेषाधिकार नसून प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क वाटत होता. त्यांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. प्रौढ साक्षरता, शिक्षक प्रशिक्षण आणि शिक्षणावरील सार्वजनिक खर्च वाढवण्यावर त्यांनी भर दिला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली १९४८ मध्ये त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना केली. त्याच शिफारशींमधून १९५३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली आणि १९५६ मध्ये त्याला वैधानिक दर्जा मिळाला.

अशा विद्वत्ता पूर्ण व्यक्तीने अजून एक भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया घातला. आज आपण कॉकरोच जनता पार्टीच्या निमित्ताने शिक्षण व्यवस्थेची चर्चा करीत आहोत. या पार्श्वभूमीवर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे काम पाहिले तर थक्क होऊन जायला होते. स्वतंत्र भारत अत्यंत गरीब होता. पण तो चालवण्याची जबाबदारी ज्यांच्या हातात होती त्यांचं निर्धार पक्का होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रत्येक मंत्रालयामध्ये योग्य आणि सक्षम व्यक्तींची नियुक्ती केली होती. याचे एक दुसरे उदाहरण देता येऊ शकते. ते म्हणजे चीन युद्धानंतर संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा नवे संरक्षण मंत्री कोण असावेत याची जी चर्चा सुरू झाली होती आणि योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अनेकांशी संवाद साधला होता. त्याचा सर्व तपशील स्वतंत्र भारताच्या इतिहासाच्या पानापानामध्ये आहे.

यशवंतराव चव्हाण यांची त्यासाठी निवड करण्यात आली आणि ही निवड होत असताना जे राजकारण चालू होते. त्याचा तपशील समजून घेणे खूप आवश्यक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा दृष्टिकोन कसा होता? या पदासाठी कोणकोण स्पर्धेत होते? या सर्वांची चर्चा यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेली आहे. शिवाय त्यांचे खास सचिव राम प्रधान यांनी त्यांच्याबरोबर काम करताना आलेल्या अनुभवांची ज्या आठवणी नोंदवून ठेवल्या आहेत. त्यामध्ये याचा तपशील खूप महत्वपूर्ण आहे. एखाद्या मंत्र्याची निवड कशी गांभीर्याने केली जात होती. त्यामध्ये कोणते गुण पाहिले जात होते. त्यांचा अनुभव कसा विचारात घेतला जात होता याचा सर्व तपशील वाचणे खूप महत्वपूर्ण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यशैलीची देखील कल्पना येऊ शकते. शिवाय देश घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये निर्णय घेताना ज्या तत्त्वांचा आणि निष्ठांचा विचार त्यांनी सातत्याने केला. त्याची पण प्रचिती आपल्याला येते. यासाठी आपण हे निश्चित वाचले पाहिजे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि त्यानंतरचे सर्व नाट्य आपणा सर्वास माहित आहे. त्या पार्श्वभूमीवर जेव्हा भारताला देश चालवण्याची परंपरा निर्माण करण्यापासून जी जबाबदारी होती तेव्हाच्या व्यक्तींनी किती जबाबदार पद्धतीने देशासाठी काम करीत होते. याची प्रचिती येते. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या पुढाकाराने त्या काळामध्ये ज्या आधुनिक शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या. त्या आजही भारतीय शिक्षण व्यवस्थेतील दीपस्तंभासारख्या आहेत. म्हणून हा आपण सारा आढावा घेण्याचा प्रयत्न केला.

“मौलाना आझाद ते धर्मेंद्र प्रधान..!” वरील 3 प्रतिसाद

  1. आपण नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि स्पष्ट लिहिलेले आहे आजच्या घडीला हे समयोचित ही आहे.

    नेहरूंच्या मंत्रिमंडळातील मंत्री त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कर्तबगार होते. उत्तम हिऱ्यांची जाण असणाऱ्या जोहरी व्यक्तिमत्त्वाचे नेहरूंसारखे पंतप्रधान आणि या सर्वांच्या बद्दल वारंवार या लोकांना सांगितले पाहिजे तुम्ही किती खुजे आहात आणि ही माणसं किती मोठी होती अभ्यासू होती नीतिमान होती आणि प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी असलेली होती they were responsible and accountable people त्यामध्ये भारतातील काही आयसीएस ऑफिसर्स आणि त्यांनी सांभाळलेली पदे आणि कामगिरी ह्या सगळ्या गोष्टी या लोकांना कळतील असे वाटत नाही आणि कळल्याच तर त्यानुसार करण्याची त्यांची कुवत नाही.

    आपले लेखन नेहमीच अभ्यासनीय असते. ज्ञानप्रसाराचा अखंड यज्ञ सुरूच आहे. Special appreciation by heart

    Like

  2. RSSच्या कुपमंडूक विचारसणीवर देशाला घेऊन जाण्यासाठी भाजपा कडून RSS करवून घेत आहे. हे देशासाठी अत्यंत घातक आहे. भारतीय जनतेनेच आता या RSSभाजपाला निवडणुकीत डिपॉझीट जप्त करायला हवं. नाही तर देशात यादवी माजेल.

    Like

  3. जुन्या काळामध्ये प्रत्येकाच्या विचारांची दखल घेतली जात होती व त्यांचा त्यामध्ये सखोल अभ्यास आहे हे देखील तपासले जात होते त्याचप्रमाणे ती माणसे पण देशासाठी काम करत होते स्वतःची केव्हाही त्यांनी खळगी भरली नाहीत

    Like

यावर आपले मत नोंदवा

अभिलेख (Archives)